बारामती, 15 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील मगरवाडी (कोंढाळकर वस्ती) येथे लोकसहभागातून कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याचे काम करण्यात आले आहे. या बंधाऱ्याचा लाभ आसपासच्या परिसरातील लोकांना होणार आहे. या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बंधाऱ्याच्या कामासाठी कृषि पर्यवेक्षक प्रवीण माने व कृषि सहाय्यक शरद सावंत यांनी मार्गदर्शन केले.
बारामती उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे व तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून स्वयंभू व शेतकरी राजा शेतकरी गटाने ही कामगिरी पूर्ण केली.
यावेळी मगरवाडी सरपंच अजित सोरटे, ग्रामपंचायत सदस्य नम्रता कोंढाळकर, सचिन साळुंके, शहाजी कोंढाळकर, नितीन येळे यासह शेतकरी गटातील इतर शेतकऱ्यांच्या सहकार्यातून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. या कामामुळे वाहून जाणारे पाणी त्या ठिकाणी मुरले जाईल. यामुळे परिसरातील बोरवेल तसेच विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
‘राज्यात यंदा पाऊस लांबला. त्यामुळे खरिपाचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती रोखण्याचे साधन कृषी विभागाच्या हातात नाही. मात्र, याच पाण्याचा वापर रब्बी हंगामासाठी कसा करता येईल, याबाबत उपाय करता येतात. त्यामुळेच “आम्ही वनराई बंधारे उभारणी” उपक्रम हाती घेतला. रब्बीमध्ये यंदा गहू व हरभरा या दोन मुख्य पिकांचे क्षेत्र वाढणार आहे. वनराई बंधारे झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना या दोन्ही पिकांसाठी अतिरिक्त पाणी साठ्याचा उपयोग होईल,’ अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी वडगांव निंबाळकरचे हिंदुराव मोरे यांनी दिली.
One Comment on “बारामतीत लोकसहभागातून उभारला वनराई बंधारा”