दौंड, 21 ऑगस्टः दौंड तालुक्यातील पाटस येथील गावठाणात अज्ञात व्यक्तींकडून कुत्र्यांवर रसायन (केमिकल) टाकून जिवंत मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या रासायनिक हल्ल्यात दोन कुत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर तीन कुत्र्यांवर उपचार सुरू आहेत.
बारामतीच्या जळोचीमध्ये रक्तदान शिबीर संपन्न
हा रासायनिक हल्ला गेल्या आठ- दहा दिवसांपासून एक ते दोन दिवसांआड सुमारे पाच कुत्र्यांवर करण्यात आला. कुत्र्यांच्या अंगावर विशिष्ट प्रकारचे रसायन (केमिकल) टाकले जाते. त्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणात भाजते. अक्षरशः कुत्र्यांच्या अंगावरील चगदे निघतात आणि तडफडून त्यांचा मृत्यू होतो.
हल्ल्यात दोन दिवसांपूर्वी दोन कुत्र्यांना उपचराआधीच मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून पाटस गावात हे अमानुष रासायनिक हल्ला सत्र मुक्या जनावरांच्या जिवावर उठले आहे. पीडित कुत्र्यांवर डॉ. खंडेराव जगताप यांनी उपचार केले. याकामी वाईल्ड अॅनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे स्वयंसेवक ऋग्वेद रोकडे, महेश पवार, डॉ. खंडेराव जगताप, हर्षद बंदिष्टी, अक्षय टिक्के, ओंकार पंडित, सुनील पाटणकर, चैतन्य बंदिष्टी, अर्णव रंधवे, अनिकेत बंदिष्टी, यज्ञेश बंदिष्टी, सुयोग कुलकर्णी, केतन दोशी, गौरव कुलकर्णी यांनी पुढाकार घेत पीडित कुत्र्यांवरील पुढील उपचाराची जबाबदारी घेतली आहे.
या घटनेची तक्रार पाटस पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. लवकरात लवकर अमानुष कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना गजाआड करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. या घटनेचा परिसरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे.