बारामती, 31 मे: (अभिजीत कांबळे) बारामती शहरात मटक्याचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असून, या व्यवसायात आता मालकापेक्षा नोकरच डोईजड झाला आहे. पानगल्ली, म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा परिसरात याचा ठळक प्रत्यय येत आहे. “चहा पेक्षा किटली गरम” अशी स्थिती निर्माण झाली असून, एजंट (नोकर) मालकाला मागे टाकून स्वतःचा दबदबा निर्माण करत आहेत. परिणामी, मालकी हक्कावरून वाद निर्माण होत आहेत.
यापूर्वी बारामतीने मटक्याच्या स्पर्धेतून खून, टोळी युद्धे पाहिली आहेत. आता मन्सूर आणि रुस्तम या जोडगोळीने शहरात आणि परिसरात नवीन संघर्षाची सुरुवात केली आहे. एजंट पळवा-पळवी, भाऊ वाढवा-वाढवी, प्रशासनाची साथ घेऊन एकमेकांच्या अड्ड्यांवर छापे टाकणे, उधारीवर खेळायला लावणे, पैसे बुडवणे, बुकं पळवणे असे प्रकार खुलेआम सुरू आहेत.
गंमत म्हणजे, या सगळ्याबाबत बारामती शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये कोणतेही परस्परविरोधी गुन्हे नोंदवले जात नाहीत. “तेरी भी चूप, मेरी भी चूप” अशी भूमिका घेतली जात असून, दोन बोक्यांच्या भांडणात प्रशासन मात्र गप्प आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला चाट बसतो आहे.
अनेक एजंट आणि मालक उधारीवर खेळणाऱ्या व्यक्तींवर दादागिरी, संघटित गुन्हेगारी, दडपशाही, अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे करत असूनही, याची पोलीस नोंद घेत नाहीत. का घेत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे.
यामागे बारामती शहर व तालुका प्रशासन यांच्यात संगनमत असल्याचा आरोप होत आहे. स्वार्थी हितसंबंधांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
याची दखल सरकार मायबाप आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री घेणार का, हाच सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.