कोल्हापूर, 09 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुरूवारी (दि.08) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझविली. शॉक सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु, या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा सध्या शोध घेतला जात आहे.
https://x.com/ANI/status/1821609573574484469?s=19
राजर्षी छ. शाहू महाराजांनी उभारले होते नाट्यगृह
केशवराव भोसले नाट्यगृहाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हे नाट्यगृह बांधले होते. परंतु, काल अचानकपणे या नाट्यगृहाला भीषण आग लागली. त्यामुळे नाट्यगृहातील ऐतिहासिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीमुळे कोल्हापुरातील नागरिक हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. तत्पूर्वी, ही आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाला याठिकाणी बोलवण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या लगेचच घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु, काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत केशवराव भोसले नाट्यगृहातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
https://x.com/VijayWadettiwar/status/1821810268210356569?s=19
आगीच्या घटनेची चौकशी करावी – विजय वडेट्टीवार
या आगीच्या घेटनेची चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उभे केलेले आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेले केशवराव भोसले नाट्यगृहाला भयंकर आग लागली. ऐतिहासिक वारसा असलेल्या या वास्तूचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूरच्या अस्मितेला आगीची झळ पोहचली असल्याने या दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे. हयात कोणाची चूक झाली हे स्पष्ट झाले पाहिजे. कोल्हापूरकरांचा हा सांस्कृतिक वारसा आहे, हा वारसा असा राख होताना बघणे हे भावनेला धक्का लागणारा आहे. या आगीत नाट्यगृहाचे, मौल्यवान गोष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढले पाहिजे, कोल्हापूरकरांचा हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सगळे प्रयत्न केले पाहिजे,” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.