दिल्ली, 22 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. रुग्णांनी आपली औषधे घेतल्यास तो आजार पूर्णपणे बरा होतो, असा दावा पतंजलीच्या जाहिरातींमधून करण्यात आला होता. त्या जाहिरातींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. “पतंजली आयुर्वेद कंपनीने अशाच प्रकारे त्यांच्या उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्या गेल्या तर त्यांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.” असा इशारा सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबा यांच्या कंपनीला दिला आहे. त्यामुळे रामदेव बाबांसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
शिवराज राक्षे ठरला 65 वा महाराष्ट्र केसरी
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने यावेळी म्हटले की, “पतंजली आयुर्वेद कंपनीने अशा सर्व खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ थांबवायला पाहिजेत. अन्यथा कोर्ट यासंदर्भात आणखी कठोर निर्णय घेईल. तसेच एखादा विशिष्ट आजार बरा होऊ शकतो, असा खोटा दावा केल्यास कोर्ट पतंजलीच्या प्रत्येक उत्पादनावर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय देऊ शकते.” असा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तर, 2 वर्षांपूर्वी पतंजली आयुर्वेद कंपनीने त्यांच्या जाहिरातीत कोरोनिल आणि स्वसारी या औषधांमुळे कोरोनावर उपचार केले जाऊ शकतात, असे म्हटले होते. त्यानंतर आयुष मंत्रालयाने पतंजली कंपनीला फटकारले आणि त्यांना ही जाहिरात तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले होते.
हे करा, अन्यथा तुमचा UPI आयडी होऊ शकतो बंद!
याशिवाय, पतंजली आयुर्वेद कंपनी भविष्यात अशी कोणतीही जाहिरात प्रकाशित करणार नाही आणि रामदेव बाबा यांच्याकडून प्रेसमध्ये अशी प्रासंगिक विधाने दिली जाणार नाहीत याची त्यांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश देखील कोर्टाने यावेळी दिले आहेत. दरम्यान, पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे ॲलोपॅथी औषधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले होते. त्यावर ही सुनावणी घेण्यात आली. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.
One Comment on “खोट्या जाहिराती बंद करा! रामदेव बाबांना कोर्टाने फटकारले”