मुंबई, 12 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होईल, अशी ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ते शुक्रवारी (दि.12) एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे केवळ 56 टक्के वेतन देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, परिवहन मंत्र्यांनी ही घोषणा केली.
https://x.com/msrtcofficial/status/1910666618734338081?t=m9K2lr-iYhtSAezEv_MQUg&s=19
एसटी कर्मचाऱ्यांना 7 तारखेला पगार!
आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या 86 हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन केवळ 56 टक्के देता आले, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले. यापुढे महिनाभर कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचा पगार दरमहा 7 तारखेला त्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येईल. त्यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन. परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही, याची जबाबदारी मी घेईन, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले आहे.
एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहीनी – सरनाईक
पुढे ते म्हणाले की, “एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील 13 कोटी जनतेला सुरक्षितता आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहीनी आहे.” भविष्यात एसटी आर्थिक दृष्ट्या सक्षम करून प्रवासी जनतेला दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. अर्थात, यासाठी एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सकारात्मक सहकार्य अपेक्षित आहे. त्यांच्या सहकार्यासोबतच शासन म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन देखील लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बसस्थानकांवरील सुविधा व सुरक्षेत वाढ
यापुढे एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच परिवहन सेवा प्रवासीभिमुख व दर्जेदार करण्यासाठी काही चांगले निर्णय देखील आम्ही घेणार आहोत. त्यामध्ये सर्व बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ व निर्जंतुक असतील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसस्थानकावर व नवीन येणाऱ्या बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे, या वर भर देणार आहोत, अशी माहिती देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.