छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक

कल्याण, 05 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली होती. याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला अटक केली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गेल्या काही दिवसांपासून फरार झाला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक त्याचा विविध ठिकाणी शोध घेत होते. अखेर जयदीप आपटे याला पोलिसांनी बुधवारी (दि.04) रात्री कल्याण येथील त्याच्या घरातून अटक केली. यानंतर त्याला ठाण्याहून सिंधुदुर्गात नेण्यात आले. याप्रकरणी जयदीप आपटेला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

https://x.com/ANI/status/1831520884030394586?s=19

पुतळ्याचा शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांना अटक

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याच्या घटनेप्रकरणी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 109, 110, 125, 318 आणि 3(5) अंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी 30 ऑगस्ट रोजी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला कोल्हापुरातून ताब्यात घेतले. परंतु, या घटनेनंतर राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. अखेर त्याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. पुतळा दुर्घटनेप्रकरणी आता या दोघांची पोलीस चौकशी करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली

26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा कोसळण्याची घटना घडली होती. या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. परंतू, या पुतळ्याच्या उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच हा पुतळा कोसळला. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण होते. तसेच उद्घाटनानंतर इतक्या कमी वेळेत हा पुतळा कोसळल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी तसेच त्याठिकाणी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी एक समिती स्थापन केली. तसेच त्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *