पुणे, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी श्रीकांत कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा 1 वर्षाचा कार्यकाल आता 14 जून 2025 रोजी पूर्ण होत आहे. त्यानंतर 15 जून 2025 पासून नवीन जिल्हा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार असून, 20 जून 2025 रोजी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते नवीन अध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज महाराष्ट्र प्रदेश सचिव यांच्या नावाने सादर करावेत, असे आवाहन पक्षाचे सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकाद्वारे पुणे जिल्ह्यातील सर्व जिल्हा, तालुका, महिला, युवक अध्यक्ष, विविध आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आले आहे की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा अध्यक्षपदी श्रीकांत कदम यांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्या अनुषंगाने 15 एप्रिल 2024 रोजी मुळशी तालुक्यातील पौड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, संघटन सचिव परशुराम वाडेकर, सचिव सूर्यकांत वाघमारे आणि जिल्हा कार्यकारिणीच्या उपस्थितीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की, विद्यमान जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार यांचा कार्यकाल 14 जून 2024 रोजी संपल्यानंतर श्रीकांत कदम यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात यावी. त्यानुसार श्रीकांत कदम यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.
श्रीकांत कदम यांचा कार्यकाल 14 जून रोजी समाप्त
जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक मान्यवर इच्छुक असल्याने तत्काळीन अध्यक्ष विक्रम शेलार यांनी आपला 1 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करत पद सोडण्याचा निर्णय घेतला. पुढील काळात सर्व इच्छुकांना संधी मिळावी म्हणून जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाल 1 वर्षाचा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार श्रीकांत कदम यांचा कार्यकाल 14 जून 2025 रोजी संपणार आहे.
20 जूनला अध्यक्षांची निवड
नवीन जिल्हा अध्यक्ष निवडीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज सचिव, महाराष्ट्र प्रदेश यांच्या नावाने वेळेत सादर करावेत. 20 जून 2025 रोजी आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते एका नावावर शिक्कामोर्तब करून नवीन जिल्हा अध्यक्ष जाहीर करण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी केले आहे.