रेपो दरात कपात; रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

दिल्ली, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने आपल्या द्वैमासिक बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी (दि.06) पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले की, रेपो दरात 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली असून, आता दर कपातीनंतर, प्रमुख रेपो दर तीन वर्षांच्या नीचांकी म्हणजेच 5.5 टक्क्यांवर आला आहे. ज्यामुळे गृह, वाहन आणि कॉर्पोरेट कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळाला.

https://x.com/ANI/status/1930846601318109253?t=JUPRg7KZXIUE9xPGFM4uYQ&s=19

व्याजदरात कपात होणार

हा गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी रेपो दर आहे. रेपो दरात कपात झाल्यामुळे बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजदरांवर परिणाम होण्याची शक्यता असून, गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज घेतलेल्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे महत्त्वाचे पाऊल!

रेपो दरात कपात होणे ही सामान्य नागरिक आणि उद्योगक्षेत्रासाठी एक सकारात्मक पावती आहे. यामुळे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता असून, बाजारपेठेत आर्थिक हालचाली वाढण्यास मदत होईल. मात्र, महागाई नियंत्रणात ठेवताना घेतलेला हा निर्णय योग्य काळजीपूर्वक आणि संतुलित असल्याचे जाणवते. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वृद्धीला गती देण्यासाठी जो पुढाकार घेतला आहे, तो निश्चितच स्वागतार्ह आहे, परंतु भविष्यातील चलनवाढ आणि वित्तीय शिस्तीवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक ठरेल.

रेपो दर म्हणजे काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील बँकांना तात्पुरते कर्ज देते, त्यावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाचा दर म्हणजे रेपो दर होय. आरबीआय ज्या दराने हे कर्ज देते, त्याला रेपो दर म्हणतात. हा रेपो दर कमी झाल्यास बँकांना स्वस्त दरात कर्ज मिळते आणि हा दर वाढल्यास बँकांना महागड्या दरात कर्ज मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *