बंगळुरू, 04 जून: (विश्वजित खाटमोडे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अखेर 18 वर्षांच्या वाटचालीनंतर आयपीएलचं पहिले विजेतेपद पटकावलं. या ऐतिहासिक यशानंतर संपूर्ण बंगळुरूमध्ये आज (दि.04) जल्लोषाचं वातावरण होतं. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी एकत्र झाल्याने हा आनंद काही वेळातच दु:खात बदलला.
https://x.com/CMofKarnataka/status/1930281025558724620?t=qvi2BvPbBQlGzcgKSl064w&s=19
11 जणांचा मृत्यू
बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर हजारो चाहत्यांनी एकत्रितपणे विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गर्दी केली होती. अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे चेंगराचेंगरीची स्थिती उद्भवली. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून 11 जणांचा मृत्यू झाल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केलं. तर या दुर्घटनेत 47 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
10 लाखांची आर्थिक मदत जाहीर
दरम्यान, कर्नाटक राज्य सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “विजय परेड दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ ही घटना घडली. सरकारने मृतांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर सरकार मोफत उपचार करणार आहे.”
https://x.com/PMOIndia/status/1930264318626672813?t=HUwBx5hI3RlhlaRB38axEA&s=19
पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त करत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. “बंगळुरूतील ही दुर्दैवी घटना अत्यंत दुःखद आहे. या कठीण क्षणी ज्यांनी आपले जवळचे गमावले आहेत, त्यांच्यासोबत मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो.” असे त्यांनी म्हटले आहे.
बंगळुरूची पंजाबवर मात!
दरम्यान, आरसीबीने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्स संघावर 6 धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक क्षण साध्य करत संघाने आपली वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपवली.