चेन्नई, 21 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कारचा अपघात झाला आहे. ही अपघाताची घटना आज सायंकाळी सातारा जिल्ह्यातील वाई येथे घडली. सुदैवाने या अपघातात रामदास आठवले आणि इतर कोणालाही दुखापत झालेली नाही. सर्वजण सुखरूप आहेत. त्यांची कार कंटेनरला धडकली. त्यामुळे हा अपघात झाला. या घटनेत रामदास आठवले यांच्या कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
https://twitter.com/ANI/status/1770802362979958917?s=19
दरम्यान, रामदास आठवले हे सातारा जिल्ह्यातील महाड येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर ते आज वाई मधून मुंबईला जात होते. तेंव्हा रस्त्यात दोन कंटेनर थांबले होते. त्यावेळी रामदास आठवले यांची कार थांबलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. कार चालकाने ब्रेक दाबला पण त्याला ही धडक टाळता आली नाही. सुदैवाने, या अपघातात रामदास आठवले यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा अपघात झाला तेंव्हा रामदास आठवले यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि सासूबाई देखील होत्या. तर या अपघातानंतर रामदास आठवले हे दुसऱ्या वाहनाने मुंबईला रवाना झाले आहेत.