मुंबई, 3 मेः राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिसांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांना सोशल मीडिया, बॅनरबाजी, बेकायदेशीर गोमांस वाहतूक यावर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. यासाठी पोलिसांनी नऊ सूत्री धोरण जाहीर करण्यात आले आहे. या नऊ सूत्री धोरणाबाबत राज्यभरातल्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्वात महत्त्वाचे लाऊडस्पीकर वादातून कोणत्याही संघटना आंदोलन करणार नाही, याचीही काळजी घेण्याच्या सूचना आहेत.
– सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने मेसेज, फोटो, व्हिडीओ टाकून वातावरण तापवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थाची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर लगेच कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
– बेकायदेशीर गोमांस वाहतुकीवरही करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहे. बेकायदेशीर वाहतुकीमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
– पोस्टर लावण्यावरून राज्यात अनेक ठिकाणी वाद निर्माण होत आहे. त्यामुळे अनाधिकृत पोस्टर लावणाऱ्यांवर तसेच त्यावरील मजकूरावर करडी नजर राहणार आहे.
– भोंग्याच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटनेत आरोप-प्रत्यारोप होताना दिसताहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी या संघटना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरही लक्ष राहणार आहे.
– रमझान ईदनंतर बासी आणि तिवासी ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम महिला आणि युवावर्ग चित्रपट पाहण्यासाठी किंवा गार्डनमध्ये जातात. अशावेळी छेडछाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष राहणार आहे.
– नमाज पठण करण्यासाठी मशिदीत गर्दी जमा होते. अशावेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा घटनांवर पोलिसांची नजर राहणार आहे.
– कोणत्याही धार्मिक कारणावरून समाजात हिंसा निर्माण झाल्यास अशावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून संबंधितांवर कारवाई होणार आहे.
– तसेच क्रिमिनल हिस्ट्री असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात प्रतिबंधित कारवाई करण्यात येणार आहे.
– हिंदू आणि मुस्लिम बगुल भागात मोठा बंदोबस्त वाढणार आहे.