पार्थ पवार यांची सुरक्षा वाढविली! वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली

मुंबई, 23 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बातमीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. पार्थ पवार हे सध्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी ते अनेक गावांना भेटी देत आहेत. तसेच ते यावेळी अनेक लोकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, त्यांची सुरक्षा का वाढविण्यात आली? याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांची लढत बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीत दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर, पार्थ पवार हे बारामती मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत. तसेच ते सध्या बारामती मतदारसंघात प्रचार दौरे करीत आहेत. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असावा, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

दरम्यान, यंदाची लोकसभा निवडणूक ही दोन्ही पवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. त्यासाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी प्रचारदौरे आणि सभांचा धडाका लावला आहे. यंदा बारामतीत सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जीवाचे रान करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *