शस्त्रसंधीच्या काही तासांतच पाकिस्तानकडून उल्लंघन; भारताची तीव्र प्रतिक्रिया

दिल्ली, 11 मे: (विश्वजित खाटमोडे) भारत आणि पाकिस्तानच्या सैन्य संचालन महासंचालक यांच्यात शनिवारी (दि.10) सायंकाळी झालेल्या शस्त्रसंधीच्या करारानंतर केवळ काही तासांतच पाकिस्तानकडून वारंवार उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी उशिरा रात्री आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.

https://x.com/ANI/status/1921256825808450014?t=ap2eFAsIs3LDCPtcreGOpg&s=19

एलओसी आणि आयबीवर शस्त्रसंधी उल्लंघनं

त्यांनी सांगितले की, गेल्या काही तासांत नियंत्रण रेषा (एलओसी) तसेच आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) क्षेत्रात शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याच्या अनेक घटना नोंदविण्यात आल्या आहेत. हे उल्लंघन आजच झालेल्या कराराच्या स्पष्ट विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

पाकिस्तानला कडक इशारा

परराष्ट्र सचिव मिस्री यांनी सांगितले की, भारतीय सैन्य दलांनी या कारवायांना योग्य ते प्रत्युत्तर दिले असून भारत या परिस्थितीकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. त्यांनी पाकिस्तान सरकारला इशारा दिला की, अशा प्रकारच्या उल्लंघनांना त्वरित आळा घालण्यासाठी जबाबदारीने आणि सकारात्मक पावले उचलावीत.



या प्रकारामुळे दोन्ही देशांमध्ये स्थैर्य निर्माण करण्याच्या प्रयत्नांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाशी संबंधित कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, असा इशारा परराष्ट्र सचिवांनी दिला आहे.

परिस्थितीवर बारकाईने लक्ष

परराष्ट्र सचिवांनी यावर भर दिला की, संबंधित यंत्रणांना परिस्थितीवर सतत नजर ठेवण्याचे आणि गरज पडल्यास कठोर प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चिंता व्यक्त केली जात असून भारत भविष्यातील धोरणे ठरवताना सर्व घडामोडींचा बारकाईने विचार करणार आहे. भारताच्या सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि देशहिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, हे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *