पहलगाम दहशतवादी हल्ला : महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत

मुंबई, 23 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22 एप्रिल) दुपारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्रातील 6 नागरिकांनी प्राण गमावले. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

https://x.com/CMOMaharashtra/status/1914981182657433683?t=Fwfg9VJt0Y83c05M8g8nXQ&s=19

मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी (दि. 23 एप्रिल) माध्यमांशी बोलताना सांगितले की, “या हल्ल्यात ज्या महाराष्ट्राच्या नागरिकांचा जीव गेला आहे, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. राज्य सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल. त्याचबरोबर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल.”

 



“आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी समन्वय साधत आहोत. ज्या पर्यटकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट

हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून भारतीय जवानांनी पहलगाम व आसपासच्या परिसरात जोरदार शोधमोहीम सुरू केली आहे. अद्याप हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतरचा मोठा दहशतवादी हल्ला

दरम्यान, 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. पुलवामामधील त्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *