जम्मू-काश्मीर, 23 एप्रिलः (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरमधील शांत आणि रम्य पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगामच्या बैसरन परिसरात मंगळवारी (दि.22) दुपारी एक भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेला असून 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
https://x.com/PTI_News/status/1914853159689916721?t=pQU_T-pb9xbpLyen0Ax1KQ&s=19
दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार
प्राथमिक माहितीनुसार, दुपारी अंदाजे पावणे तीनच्या सुमारास काही अज्ञात सशस्त्र दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅलीत घुसखोरी करत पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. हे पर्यटक त्यावेळी घोड्यावरून परिसरातील सौंदर्याचा आनंद घेत होते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
हल्ल्यानंतर काही क्षणांतच जिल्हा प्रशासन व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. तात्काळ मदत कार्य सुरू करून जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. भारतीय सुरक्षा दलांनी संपूर्ण बैसरन परिसराला वेढा घालून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
पीएम मोदी मायदेशी परतले
या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील अधिकृत दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले. दिल्ली विमानतळावर पोहोचताच पंतप्रधानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव सहभागी झाले. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
देशभरातून हल्ल्याचा निषेध
दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावरून नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हे, तर भारताच्या शांततेवर, सौंदर्यावर आणि सार्वभौमत्वावर झालेला आघात आहे.