मराठा समाज आणि जरांगे पाटलांनी आम्हाला आणखी वेळ द्यावा- मुख्यमंत्री

मुंबई, 30 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज (दि.30) काही वेळापूर्वी पार पडली. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने आम्हाला आणखी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच राज्यात टिकवू मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचे ही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व निजामकालिन पुरावे तपास करण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आज मराठा आरक्षण उपसमितीचा अहवाल सादर करण्यात आला. या समितीने आतापर्यंत 1 कोटी 72 लाख कुणबीच्या कागदपत्रांची तपासणी केली असून यामध्ये 11 हजार 530 कुणबी नोंदी सापडल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच आणखी कुणबी नोंदी शोधण्यासाठी या समितीने मुदतवाढ देण्याची मागणी केली असल्यामुळे त्यांना यासाठी 2 महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तसेच मूळ मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. यासंदर्भात इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी काम सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, क्युरेटिव्ह पिटीशनसाठी 3 निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सरकारला मराठा आरक्षण संदर्भात मदत करणार आहे. असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा 1980 पासूनचा आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वप्रथम आरक्षण लागू केले. मात्र त्यावेळी दुर्दैवाने मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यामुळे मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण कसे देता येईल? यासाठी राज्य सरकार सर्व प्रयत्न करीत आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने आम्हाला वेळ द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच आम्ही मराठा समाजाला फसवणार नाही. इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल? याकरिता आमचा प्रयत्न आहे. जरांगे पाटील यांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. जरांगे पाटलांच्या प्रकृतीची आम्हालाही काळजी आहे. त्यांनी उपचार घेतले पाहिजेत. तसेच मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले आहे. राज्यात लाखोंचे मोर्चे काढले तरी कधी हिंसाचार झाला नाही. त्यांनी यापुढे देखील जाळपोळ करू नये. मराठा समाजाच्या आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये. याबाबत मराठा समाजाने सतर्क राहावे. राज्यात शांतता प्रस्थापित करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे ते मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटील हे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

One Comment on “मराठा समाज आणि जरांगे पाटलांनी आम्हाला आणखी वेळ द्यावा- मुख्यमंत्री”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *