मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई, 14 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने आजच्या दिवशी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार, आज सकाळपासूनच राज्यभरातील विविध ठिकाणी बंद पाळला जात आहे.

विविध ठिकाणी बंद पाळला जातोय!

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यानुसार राज्यातील बीड, नाशिक, सोलापूर, जालना, पुणे यांसारख्या अनेक जिल्ह्यांत सध्या बंद पाळण्यात येत आहे. सोबतच राज्यातील बहुतांश ठिकाणी जरांगे पाटलांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने आज विविध आंदोलने केली जात आहेत.

तात्काळ अध्यादेश लागू करावा: जरांगे

दरम्यान, कुणबी नोंदी संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत हा अध्यादेश लागू होत नाही, तोपर्यंत अन्न, पाणी घेणार नाही. असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. यावेळी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक उपोषणस्थळी गेले होते. परंतू, मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी कोणतेही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. नोंदी असलेल्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, राज्यभरातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे यांचा सरकारने अध्यादेश काढावा, या प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *