लोकसभा निवडणूक; सातव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावणार

वाराणसी, 30 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज सायंकाळी समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर, विविध राजकीय पक्षांचे नेते प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभा आणि रॅली काढताना दिसत आहेत. तसेच सर्वच राजकीय पक्ष सध्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व शक्ती वापरताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात देशातील सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 57 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 904 उमेदवार रिंगणात आहेत.

https://twitter.com/airnews_mumbai/status/1796018186116116754?s=19

या जागांवर मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिशातील 6, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 3, आणि चंदीगडमधील एका जागेवर येत्या 1 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, देशात यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. यांतील सहा टप्प्यांतील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. देशात 1 जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. तर देशातील लोकसभा निवडणुकीच्या सर्व जागांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. तसेच लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती या पाटलीपुत्र मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर, पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. याशिवाय अभिनेत्री आणि भाजप उमेदवार कंगना राणौत ही हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांसारख्या सातव्या टप्प्यातील अनेक उमेदवारांचे भवितव्य 1 जून रोजी ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *