नागपूर, 19 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) देशात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. देशातील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदारांनी आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. दुपारी जास्त ऊन असल्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर सकाळी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर मतदान केंद्रावर कोणताही अनुचित किंवा गैरप्रकार घडू नये, यासाठी सर्वच मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लोकसभा निवडणूक २०२४
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) April 19, 2024
राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरुवात
सायं. ५ वाजेपर्यंत सरासरी ५४.८५% मतदान
आपला मताधिकार बजावलेल्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #Election2024 pic.twitter.com/qWFhMWwjAM
कोणत्या मतदारसंघात किती मतदान?
राज्यात पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. यामध्ये रामटेक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा- गोंदिया आणि गडचिरोली- चिमूर या मतदार संघांचा समावेश आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 54.85 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये गडचिरोली- चिमूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. पहिल्या टप्प्यात रामटेक लोकसभा मतदारसंघात 52.38 टक्के, नागपूर मतदारसंघात 47.91 टक्के, भंडारा- गोंदिया मतदारसंघात 56.87 टक्के, गडचिरोली- चिमूर मतदारसंघात 64.95 टक्के आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 55.11 टक्के इतके मतदान झाले आहे.
या बड्या नेत्यांचे भवितव्य EVM मध्ये बंद
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने मतदार केंद्रांवर चोख व्यवस्था केली होती. राज्यात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांसारख्या बड्या नेत्यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे.