लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर! सात टप्प्यांत होणार मतदान

मुंबई, 16 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. यंदाची लोकसभा निवडणूक 7 टप्प्यांत पार पडणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी, चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी, पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी, सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी आणि सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. तर त्याची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. याच दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यासंदर्भातील माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी दिली. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे.

 

देशात इतके मतदार आहेत

येत्या 16 जून रोजी 17 व्या लोकसभेची मुदत संपत आहे. भारतात सध्या देशात 97 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. यामध्ये 49.7 कोटी पुरुष मतदार, तर 47.1 कोटी महिला मतदार आहेत. यंदा देशात 82 लाख प्रौढ मतदार आहेत. याशिवाय देशात सध्या 48 हजार तृतीयपंथीय मतदार आहेत. तसेच भारतात 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. याची माहिती राजीव कुमार यांनी यावेळी दिली.

महिला मतदारांची संख्या वाढली

दरम्यान, यावेळेस देशात महिला मतदारांचा आकडा वाढला आहे. भारतात 85 लाख नव्या महिला मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. तसेच 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आहेत. देशात 85 वर्षावरील 82 लाख मतदार आहेत. तर यंदा 1 एप्रिल रोजी ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत, अशा युवा मतदारांना देखील मतदानाचा अधिकार असेल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी दिली.

दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधा

यंदाच्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मतदान करता यावे म्हणून दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. याशिवाय 85 वर्षांवरील नागरिक आणि मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या नागरिकांना आपल्या घरातूनच मतदानाची सोय करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *