कोल्हापूर, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूर येथील जोतिबा डोंगर परिसरात ‘दख्खन केदारण्य’ या ऐतिहासिक वनसमृद्ध परिसराची पुन्हा निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत 10,000 वृक्षांचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास विविध मंत्री, मान्यवर आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
https://x.com/CMOMaharashtra/status/1930678370318377029?t=Jq1CqQJKH_VwXqDhjACcmg&s=19
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वनविभाग, जिल्हा प्रशासन आणि पश्चिम देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी ‘श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणा’च्या ऑनलाईन शुभारंभाचाही समावेश होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दख्खन केदारण्य’ या संकल्पनेचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “सुमारे चार हजार वर्षांपूर्वी जोतिबा डोंगर परिसरात अस्तित्वात असलेले प्राचीन वन आज पुनः निर्माण करण्याचा संकल्प घेतला जात आहे, हे निश्चितच प्रेरणादायी आहे. या परिसरात लाखो भाविक येतात, त्यामुळे त्यांच्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होण्यासोबतच निसर्ग संवर्धनालाही चालना मिळेल.”
ते पुढे म्हणाले की, “जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याच्या माध्यमातून पर्यावरणपूरक तसेच भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. राज्य सरकार या सर्व उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य करेल.” जोतिबा डोंगर परिसर पुन्हा हिरवाईने नटण्यासाठी आणि ‘दख्खन केदारण्य’ म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, दख्खन केदारण्य’च्या संकल्पनेतून पर्यावरण रक्षण, सांस्कृतिक जतन आणि भाविकांच्या सुविधा या तिन्ही उद्दिष्टांचा समन्वय साधण्याचा एक सकारात्मक प्रयत्न दिसतो. अशा प्रकारची दीर्घकालीन विचारांची धोरणे राबविली गेल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा तयार होईल. निसर्ग आणि श्रद्धा यांचा संगम असलेल्या या उपक्रमातून एक आदर्श मॉडेल तयार होऊ शकते, जे महाराष्ट्रातील इतर तीर्थक्षेत्रांसाठी प्रेरणादायक ठरेल.