नवी मुंबई, 26 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी निघाले आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावातून मोर्चा काढला आहे. त्यांचा हा मोर्चा आज नवी मुंबईतील वाशी येथे दाखल झाला आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची आज वाशी येथे भेट घेतली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका भाषणातून स्पष्ट केली.
ग्रामपंचायतींमध्ये कुणबी नोंदी मिळालेले कागद सादर करा: जरांगे पाटील
“शासनाच्या वतीने चर्चा झाली. शासनाला आपण मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांसाठी आपण मुंबईपर्यंत आलो होतो. 54 लाख मराठ्यांच्या नोंदी खरंच सापडल्या तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्या नेमक्या कोणाच्या? हे माहिती करायचे असेल तर, ग्रामपंचायतींमध्ये कुणबी नोंदी मिळालेले कागद तुम्ही सादर केले पाहिजेत. तरच तुमची नोंद सापडली आहे की नाही? ते कळेल आणि तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करता येईल. असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तर काही जणांनी अर्ज केलं नाही त्यामुळे त्यांना दिलं नाही. पण त्याला नोंदी मिळाल्याची माहितीच नसेल तर तो अर्ज कसा करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यामुळे 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळेल: मनोज जरांगे पाटील
कुणबी नोंदी मिळाल्याची माहिती देण्यासाठी गावागावात शिबिरे आयोजित करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यांची ही मागणी सरकारने मान्य केली असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी सरकारने गावागावात शिबिरे सुरू केली आहेत. आता 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळतील. नोंदी मिळालेल्या व्यक्तीच्या संपुर्ण परिवाराला देखील कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. त्यामुळे एका नोंदीवर 5 जणांना जरी फायदा झाला तरी 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळेल. असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांनी अर्ज करा, जरांगे पाटलांचे आवाहन
54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहेत. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत. त्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. सुद्धा आपली जबाबदारी आहे. आपल्याला समाज म्हणून नोंदी शोधण्यासाठी मदत करायची आहे. आपण अर्जच केला नाही तर ते प्रमाणपत्र कसे देणार? त्यासाठी आपण तातडीने अर्ज करा. आपण त्यांना 4 दिवसातच प्रमाणपत्र वाटप करण्याचं सांगितलं होतं. तर सरकारने त्यापैकी 37 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वितरित केल्याचे सांगितले आहे. या 37 लाख लोकांची माहिती सरकारला मागितली आहे, असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.