अहमदाबाद, 19 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज, (रविवारी) विश्वचषक 2023 चा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज दुपारी 2 वाजल्यापासून खेळविण्यात येणार आहे. क्रिकेटच्या कोणत्याही मोठ्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ असला तर तो फेव्हरेट मानला जातो. मात्र, यंदाच्या विश्वचषकातील परिस्थिती अगदी वेगळी आहे. या विश्वचषकात भारतीय संघाला फेव्हरेट मानले जात आहे. या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी अव्वल दर्जाची राहिली आहे. तसेच भारतीय संघातील सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ विजयी होऊन तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकेल यात काही शंका नाही. मात्र, अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलिया संघाचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला हलक्यात घेण्याची चूक करूच शकत नाही.
नामदेव जाधवांच्या तोंडाला काळे फासले
आजचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीत सामना झाला होता. या सामन्यासाठी जी खेळपट्टी वापरण्यात आली होती, त्याच खेळपट्टीवर आजचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. दरम्यान या खेळपट्टीवर झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा डाव 191 धावांत गुंडाळला होता. तर त्यानंतर भारताने 30.3 षटकांत 3 बाद 192 धावा करून हा सामना जिंकला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची खेळी केली होती. तर गोलंदाजीत बुमराह, सिराज, कुलदीप, पांड्या आणि जडेजा यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या होत्या.
विश्वचषक 2023 च्या साखळी फेरीत नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकूण 4 सामने खेळविण्यात आले होते. यामध्ये 3 सामन्यांत दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. तर एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी ठरला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडविरुद्ध सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 33 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 287 धावांचे लक्ष्य ठेवले होते. तर प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 253 धावांत सर्वबाद झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झॅम्पाने 3 विकेट घेतल्या होत्या.
3 डिसेंबरला राजस्थानमधून काँग्रेस हद्दपार होणार – नरेंद्र मोदी
या मैदानावर झालेल्या 4 सामन्यांत वेगवान गोलंदाजांनी 35 आणि फिरकी गोलंदाजांनी 22 विकेट घेतल्या आहेत. यावरून ही खेळपट्टी ही गोलंदाजांना उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामन्यांत गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. तत्पूर्वी साखळी फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक सामना झाला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट राखून पराभव केला होता. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा डाव 199 धावांत गुंडाळला होता. तर प्रत्युत्तरात भारताने 41.2 षटकांत 4 बाद 201 धावा करून हा सामना जिंकला होता. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात देखील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा, अशी अपेक्षा करोडो भारतीय क्रिकेट चाहते करीत आहेत.
One Comment on “भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विजेतेपदासाठी सामना”