अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला हायकोर्टाची स्थगिती

दिल्ली, 21 जून: (विश्वजीत खाटमोडे) कथित दारू घोटाळा प्रकरणी सध्या तुरूंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल येथील राऊस एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला होता. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात ईडीने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिलेल्या जामिनाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सध्यातरी तुरूंगातून बाहेर येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://x.com/AHindinews/status/1804024462976618742?s=19

सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्थगिती

दरम्यान, या संदर्भातील याचिकेवर आता दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. हायकोर्टातील ईडीच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत राऊस एव्हेन्यू कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. म्हणजेच हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत अरविंद केजरीवाल यांना तुरूंगातच राहावे लागणार आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध दर्शवला आहे. त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, दारू घोटाळ्याच्या तपासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर केजरीवाल यांना बाहेर सोडल्यास याचा तपासावर परिणाम होईल. कारण, केजरीवाल यांच्याकडे महत्त्वाचे असे मुख्यमंत्री पद आहे.

2 जूनला आत्मसमर्पण केले होते

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरूंगात आहेत. त्यांना ईडीने दिल्लीतील दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने 10 मे रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्ली सचिवालयात न जाण्याचे आदेश देखील यावेळी सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना दिले होते. त्यानुसार, अरविंद केजरीवाल यांनी 2 जूनला पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *