जालना, 2 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने काल सर्वपक्षीय बैठक घेतली होती. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी ठराव संमत करीत मनोज जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, या सर्व पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या या आवाहनानंतर देखील मनोज जरांगे हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी नेमणूक केलेले शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी गावात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेणार आहे. हे शिष्टमंडळ दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांच्या गावात दाखल होणार आहे. यावेळी मनोज जरांगे यांच्याशी हे शिष्टमंडळ मराठा आरक्षण संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहे. त्यामुळे या चर्चेमध्ये मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा निघतो की नाही? याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आज भारत विरुद्ध श्रीलंका सामना
तत्पूर्वी, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. तसेच त्यांनी काल सायंकाळपासून पाणी देखील पिणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाला सध्या अनेक स्तरांतून पाठिंबा मिळाल्याचे दिसत आहे. तसेच मराठा समाजाच्या वतीने अनेक गावांतअनेक प्रकारचे आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चांना महिलांचा देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या या आंदोलनात काही ठिकाणी हिंसक घटना ही घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर, राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे मात्र, या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या आंदोलनात काही ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत. त्यामुळे महामंडळाने राज्यातील अनेक ठिकाणी एसटीच्या गाड्या रद्द केल्या आहेत. आंदोलनात एसटीच्या गाड्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मात्र, राज्यातील सर्व सामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
आशा सेविकांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारचा मोठा निर्णय
One Comment on “सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार जरांगे पाटलांची भेट”