कृषी पुरस्कारांच्या रक्कमेत चौपट वाढ! राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई, 08 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कामासाठी दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात. तर आता या कृषी पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्याला किंवा संस्थेला राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

कृषी पुरस्कारांची संख्या आणि महागाई भत्त्यात वाढ!

आता कृषी क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच पुरस्कार विजेत्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता दैनिक प्रवास भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यानुसार, तर प्रत्येक विजेत्याला आता 15 हजार रुपये भत्ता देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती. तर कृषी पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याच्या या घोषणेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

कोणत्या पुरस्कारांच्या रकमेत किती वाढ?

कृषी विभागाच्या या निर्णयानुसार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार विजेत्याला आता 3 लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. तर यापूर्वी या पुरस्कार विजेत्याला 75 हजार रुपये इतकी रक्कम मिळत होती. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार (8), जिजामाता कृषी भूषण पुरस्कार (5), कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार (8) आणि उद्यान पंडित पुरस्कार (8) या चारही कृषी पुरस्कार विजेत्यांना आता प्रत्येकी 2 लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. यापूर्वी ह्या चारही पुरस्कारांची रक्कम 50 हजार इतकी होती. यासोबतच वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार (3) व युवा शेतकरी पुरस्कार (8) या पुरस्कार विजेत्यांना आता लाख 20 हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. यापूर्वी या पुरस्कारांसाठी 30 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येत होती.

तसेच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट (34) आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट (06) या पुरस्कारांसाठी आता 44 हजार रुपये मिळणार आहेत. यापूर्वी या पुरस्कार विजेत्यांना 11 हजार रुपये मिळत होते. तर आता पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार 10 जणांना देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार 4 जणांना देण्याचा निर्णय देखील कृषी विभागाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *