निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; राज्यात आजपासून आचारसंहिता लागणार?

मुंबई, 15 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाची मंगळवारी (दि.15) पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहेत. निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद आज दुपारी 3 वाजता पार पडणार आहे. अशा परिस्थितीत राज्यात आजपासून आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाण्याची शक्यता आहे.

https://x.com/ANI/status/1846027475135951123?t=7vBewDVGbUY1pSiqh6Z-yw&s=19

26 नोव्हेंबरला सरकारचा कार्यकाळ संपणार

महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ येत्या 26 नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे. त्याआधी निवडणुका घेण्याचे आयोगाचे लक्ष्य असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात एकूण 288 जागांवर विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी 145 जागांचा बहुमताचा आकडा पार करणे आवश्यक आहे. त्यामुळे 145 किंवा त्याहून अधिक जागा जिंकणारा पक्ष किंवा आघाडी राज्यात सरकार स्थापन करणार आहे. राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्यापैकी खुला वर्गाचे 234 मतदारसंघ, अनुसूचित जमाती 25 आणि अनुसूचित जाती 29 यांच्यासाठी मतदारसंघ आहेत.

आयोगाचा महाराष्ट्र दौरा 

तत्पूर्वी, 29 सप्टेंबर रोजी भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील 11 राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण 9.59 कोटी इतके मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या 4.64 कोटी, तर पुरूष मतदारांची संख्या 4.95 टक्के इतकी आहे. याशिवाय राज्यात 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या देखील भरपूर आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा एकूण 19.48 लाख मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. असे निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *