बारामती, 29 मे: (अभिजित कांबळे) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत विकसित कृषी संकल्प अभियान, खरीप पूर्व पीक नियोजन संदर्भात बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथून सुरूवात झाली. याप्रसंगी प्राध्यापक डॉ. जमदग्नी निवृत्त कडधान्य संशोधन प्रकल्प प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे, एनआयएएसएम विभाग प्रमुख डॉक्टर नितीन कुऱ्हाडे, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी सुभाष बोराटे ,राहुरी कृषी विद्यापीठाचे देशी गोवंश सुधार प्रकल्प प्रमुख डॉ. सोमनाथ माने, के व्ही के संतोष गोडसे आणि संतोष करंजे, सुपरवायझर मीरा राणे उपस्थित होते.
या मान्यवरांच्या उपस्थितीत खरीप अभियानाच्या रथास हिरवा झेंडा दाखवून अभियानाची सुरुवात करण्यात आली हे अभियान आजपासून 12 जून पर्यंत प्रत्येक तालुक्यात सुरू राहणार आहे 90 पेक्षा जास्त गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच या अभियानाच्या अंतर्गत कृषी विभागाच्या योजना, नाविन्यपूर्ण शेतीची माहिती, माती परीक्षण, ड्रोन तंत्रज्ञान बी बियाणे आणि फळ रोपे इत्यादी विषयी मार्गदर्शन होणार असल्याचे संतोष गोडसे यांनी प्रास्ताविका मध्ये सांगितले. डॉ. सोमनाथ यांनी देशी गोवंश सुधार प्रकल्प बाबत माहिती सांगितली.
दुधाची क्वालिटी, उपपदार्थ, शेणापासून होत असलेले विविध वस्तू व खतांच्या महत्त्व बाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. नितीन कुराडे यांनी राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था माळेगाव येथे सुरू असलेल्या विविध संशोधनाची माहिती दिली.
डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांनी सोयाबीन लागवड ते काढणीपर्यंत सोया संजीवनीच्या फवारण्या करून एकरी वीस क्विंटल उत्पादन कसे काढायचे? याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले प्रतिभा कंपनीचे चेअरमन अशोक पाटील तावरे, बळराम शेतकरी कंपनीचे चेअरमन बाळासाहेब तावरे (सर) व संग्राम तावरे अध्यक्ष गायत्री शेतकरी मंडळ यांनी कार्यक्रम आयोजनासाठी नियोजन केले. या कार्यक्रमाचे आभार श्री संतोष करंजे यांनी मानले.