मुंबई, 19 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विश्वचषकातील अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्याच्या आधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून प्रत्येक गोष्टीचे राजकारण झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी राजकीय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये. पण काय करणार, असाच काहीसा प्रकार अहमदाबादमध्ये घडत आहे. सध्या क्रिकेटचे राजकारण केले जात आहे. असे संजय राऊत म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जात असलेल्या पोलिसांचा अपघाती मृत्यू
पुढे संजय राऊत म्हणाले की, “पंतप्रधान मोदी हे आजच्या सामन्यात स्वत: गोलंदाजी करतील आणि अमित शहा फलंदाजी करतील, बाकीचे भाजप नेते सीमारेषेवर उभे राहतील, असे दिसते. आजकाल देशात काहीही घडू शकते. आता आपल्याला ऐकायला मिळेल की, स्टेडियममध्ये पीएम मोदी म्हणतील, हे शॉट्स मारा आणि असे खेळा. मोदी होते म्हणून हा सामना जिंकला.”
दरम्यान, आजचा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स हे नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री देखील हा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर येणार असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांना लक्ष केले आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विजेतेपदासाठी सामना
तत्पूर्वी, या सामन्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करून भारतीय संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “140 कोटी भारतीय तुमचा जयजयकार करत आहेत. तुम्ही तेजस्वी व्हा, चांगले खेळा आणि खिलाडूवृत्तीची भावना कायम ठेवा. ऑल द बेस्ट टीम इंडिया!” असे नरेंद्र मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
2 Comments on “मोदी सरकार आल्यापासून क्रिकेटचा राजकीय कार्यक्रम झालाय – संजय राऊत”