मालवण, 27 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काल (सोमवारी) अचानकपणे कोसळला. या पुतळ्याचे उद्घाटन 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटनानंतर इतक्या कमी वेळेत हा पुतळा कोसळल्यामुळे सध्या सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
https://x.com/ANI/status/1828135788028264900?s=19
कंत्राटदार, स्ट्रक्चरल कन्सल्टंट विरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याच्या घटनेप्रकरणी हा पुतळा बसवणारा कंत्राटदार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 109, 110, 125, 318 आणि 3(5) अंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1828073263873790208?s=19
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने बसवला होता. त्याची रचनाही नौदलानेच केली होती. परंतु, याठिकाणी ताशी सुमारे 45 तास वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यामुळे या पुतळ्याचे नुकसान झाले आणि तो खाली कोसळला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच आज पीडब्ल्यूडी आणि नौदलाचे अधिकारी घटनास्थळाला भेट देतील आणि ते हा पुतळा कोसळण्याच्या घटनेमागील कारणांचा शोध घेतील, अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेमागची कारणे शोधून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा उभारू,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.