अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कौतुक

मुंबई, 28 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

https://x.com/CMOMaharashtra/status/1806642996210966706?s=19

https://x.com/CMOMaharashtra/status/1806665693771038994?s=19

https://x.com/CMOMaharashtra/status/1806665882850185275?s=19

मुख्यमंत्र्यांकडून योजनांची माहिती

एक लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा गजर करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातील महिला, बेरोजगार युवक-युवती यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी या अर्थसंकल्पात महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलीना व्यावसायिक शिक्षण मोफत, पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी 15 हजार कोटींचा प्रकल्प, शेतीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण वीज माफी देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम, शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण, एकूणच दुर्बल घटकाचे दारिद्रय नाहीसे करण्यासाठी केलेला निश्चय यामुळे हा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुलींसाठी मोफत शिक्षण

विशेषत: महिलांना राज्य सरकार मार्फत दरमहा दीड हजार रुपये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण त्यामुळे राज्य सरकारने महिलांप्रती बांधिलकी व्यक्त केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे असल्याचे हे देखील या अर्थसंकल्पातून दिसते. गाव तेथे गोदाम या नवीन योजनेमुळे धान्य साठवणुकीचा प्रश्न निकाली निघेल. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार अर्थसहाय, सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम, मागेल त्याला सौर उर्जा पंप या योजना देखील शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणतील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

वारकऱ्यांसाठी घोषणा

जागतिक वारसा नामांकनासाठी पंढरपूर वारी, कोकणातील कातळशिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे प्रस्तावही पाठविण्याचा तसेच रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचा घेतलेला निर्णयही महत्वाचा आणि आपल्या संस्कृती व इतिहासाला जपण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी 20 हजार रूपये, निर्मल वारीसाठी निधी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्याची केलेली घोषणा म्हणजे आमची वारकरी संप्रदायाप्रती भक्तिभावाचे उदाहरण आहे, त्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *