मुंबई, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू या प्रकल्पाचे येत्या 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या अटल सेतूची पाहणी करून त्याचा आढावा घेतला. शिवडी ते चिर्ले या 22 किमी लांबीच्या पूलाची पाहणी करतानाच यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठिकठिकाणी उतरून तेथील सुविधांचा आढावा घेतला. त्या अनुषंगांने मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील विविध सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1743518500117946552?s=19
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू वरील चिर्ले टोल प्लाझाजवळील कमांड सेंटरला भेट देऊन त्याची पाहणी केली. अटल सेतूवरील वाहतुकीचे नियंत्रण आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे कार्य आदींचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. सोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनासह एमएमआरडीए अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1743518644527853903?s=19
देशातील सर्वात मोठा सागरी पूल
दरम्यान, या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे दोन शहरांमधील अंतर कमी होईल. तर हा सागरी पूल 22 किलोमीटर लांबीचा असून हा 6 लेनचा प्रकल्प आहे. या पुलाचा 16.5 किमी भाग समुद्रावर बांधला आहे. तर उर्वरित 5.5 किमी भाग जमिनीवर आहे. अटल सेतु हा भारतातील सर्वात मोठा सागरी पूल आहे. या पुलाच्या कामासाठी 18 हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तत्पूर्वी, राज्य सरकारने अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू वरून प्रवास करण्यासाठी एका कारला 250 रुपयांचा टोल निश्चित केला आहे.