मुंबई, 16 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज राज्य मागासवर्ग आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पहिल्यापासून सकारात्मक पाऊले उचलत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. तसेच जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1758374983116734582?s=19
मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा करणार: मुख्यमंत्री
मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. यासाठी साडेतीन ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करीत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेले मराठा आरक्षण हायकोर्टात टिकले होते. मात्र, दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टात टिकले नव्हते. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आता राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे: एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मनोज जरांगे पाटलांना त्यांचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार पहिल्यापासून सकारात्मक आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार वेळोवेळी पाऊले टाकत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मराठा आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने येत्या 20 जानेवारी रोजी विधिमंडळाचे अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडण्यात येणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानंतर मनोज जरांगे पाटील हे त्यांचे उपोषण मागे घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.