दिल्ली, 20 जून: (विश्वजीत खाटमोडे) देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने खरीप हंगामातील 14 पिकांवर एमएसपी अर्थात आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तुरडाळ, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, काळे तीळ आणि कापूस यांसारख्या पिकांचा समावेश आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने 2024-2025 या वर्षासाठी खरीप पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
https://x.com/PIB_India/status/1803455149035364429?s=19
धानासाठी एमएसपी 2300 रुपये
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या नवीन निर्णयानुसार, 2024-25 या खरीप हंगामातील धानासाठी एमएसपी 117 रुपयांनी वाढवून 2300 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. तसेच धानाच्या ग्रेड A साठी एमएसपी 2320 रुपये प्रति क्विंटल असेल. ज्वारी-हायब्रीडचा एमएसपी 191 रुपयांनी वाढवून 3571 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. ज्वारी- मालदंडीचा एमएसपी 196 रुपयांनी वाढून 3421 रुपये प्रति क्विंटल केला गेला आहे.
तूरीचा एमएसपी 7550 रुपये
सोबतच बाजरीचा एमएसपी 125 रुपयांनी वाढवून 2625 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. नाचणीचा एमएसपी 444 रुपयांनी वाढून 4290 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. मक्याचा एमएसपी 135 रुपयांनी वाढवून 2225 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. तूर धान्याच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 550 रुपयांची वाढ करून त्याची एमएसपी 7550 रुपये प्रति क्विंटल इतकी करण्यात आली आहे. भुईमुगाचा एमएसपी 406 रुपयांनी वाढून प्रति क्विंटल 6783 रुपये झाला आहे. याशिवाय सूर्यफुलाचा भाव 520 रुपयांनी वाढून प्रति क्विंटल 7280 रुपये, तीळ 632 रुपयांनी वाढून 9267 रुपये आणि काळ्या तिळाचा एमएसपी 983 रुपयांनी वाढून 8717 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.