दंतेवाडा, 06 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) छत्तीसगड राज्यातील नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा जवानांनी अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत आतापर्यंत 31 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांचे मृतदेह येथील शवागारात ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, शवागाराबाहेर सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच या भागात सध्या शोध मोहीम सुरू आहे.
https://x.com/AHindinews/status/1842769397439742327?t=FMmKeHmi88cdVc53tOF9eQ&s=19
https://x.com/AHindinews/status/1842541905554600172?t=Uxl1uAqBIjQ51_Rm_6eBhQ&s=19
दोन तास चकमक
नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागातील घनदाट जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्याआधारे सुरक्षा रक्षकांनी परिसराची नाकाबंदी करून ही कारवाई केली. त्यावेळी सुरक्षा पथकातील जवान आणि नक्षलवादी यांच्यात मोठी चकमक उडाली. यामध्ये नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावेळी सुरक्षा जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. याठिकाणी सुमारे 2 तास गोळीबार सुरू होता. या कारवाईत 31 नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये 18 पुरूष आणि 13 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.
https://x.com/AHindinews/status/1842561717190144132?t=XfxOa1Sv2qDPs4G4N1rBpg&s=19
शोध मोहीम सुरू
सुरक्षा रक्षकांच्या या पथकात पोलीस, जिल्हा राखीव रक्षक विशेष टास्क फोर्सचे जवान यांचा समावेश होता. यावेळी घटनास्थळावरून एलएमजी रायफल, एके 47 रायफल, एसएलआर रायफल, इन्सास रायफल, कॅलिबर 303 रायफल आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाई दरम्यान या नक्षलवाद्यांचे काही साथीदार पळून गेले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर, या भागांत सध्या सुरक्षा जवानांकडून शोध मोहीम राबविली जात आहे. तसेच याचा तपास सुरक्षा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.