बारामती, 26 मे: (अभिजित कांबळे) बारामती तालुक्यातील इंदापूर रोडवरील बांदलवाडी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे स्थानिक शेतकरी, व्यवसायिक आणि युवा उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाच्या ओव्हरफ्लोमुळे काळापुलाजवळील आरोग्यदायी नर्सरी संपूर्णतः पाण्याखाली गेली असून, या नर्सरीचे मालक मंगेश घाडगे यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
पहा व्हिडिओ –
मंगेश घाडगे हे बीएससी अॅग्रीकल्चरची पदवी घेतलेले एक तरूण शेतकरी आहेत. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, बँकेकडून कर्ज घेत हा नर्सरी प्रकल्प उभा केला होता. यामध्ये शेडनेट व ऊस डोळा कटिंग मशीन, त्याचप्रमाणे लहान रोपांची निर्मिती, औषध फवारणीचे यंत्र, पाण्याच्या मोटारी, इलेक्ट्रिक वायरिंग यांसह आधुनिक शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी मेहनतीने संकलित केले होते.
मोठ्या प्रमाणात नुकसान
मात्र, अचानक आलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे हे सर्व साहित्य सुमारे 2 ते 3 फूट पाण्यात बुडाले. जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे शेडनेट पूर्णतः फाटले, अनेक रोपे सडून गेली, औषधाचे साठे वाया गेले, मशीनरी बंद पडली आणि संपूर्ण संरचना ढासळली. पाण्याबरोबर आलेल्या चिखलामुळे झाडांच्या मुळांमध्ये माती अडकून झाडे मरू लागली आहेत. या सर्व गोष्टींमुळे प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात आले आहे.
विशेष म्हणजे, मंगेश यांनी ही नर्सरी केवळ व्यवसायासाठी नव्हे तर आरोग्यदायी, नैसर्गिक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली होती. त्यांनी स्थानिक तरूणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र निसर्गाच्या कोपामुळे हे सर्व प्रयत्न एका झटक्यात जमीनदोस्त झाले आहेत.
शासनाने नुकसान भरपाई द्यावी
या नैसर्गिक आपत्तीमुळे उभ्या असलेल्या तरुण शेतकऱ्याच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. शासनाच्या ‘स्टार्टअप इंडिया’, ‘युवा शेतकरी’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांचा आदर्श उदाहरण असलेल्या या मंगेश घाडगे यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
महसूल, कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी भेट देऊन त्वरित पंचनामा करून नुकसानाची योग्य ती माहिती घ्यावी आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केवळ मंगेश घाडगे यांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी अशी अपेक्षा केली जात आहे.