मुंबई, 4 जूनः मागील काही महिन्यात राज्यात कोरोनाचा जोर ओसरला होता. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईत दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र मुंबईत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निर्बंध लागणार का? असा प्रश्न भेडसावू लागला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 1157 रुग्णांचे निदान झाल्याची माहिती समोर येत आहे. तर एकट्या मुंबईत 889 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत सापडले आहेत. सध्या मुंबईत कोरोनाचे 4294 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईनंतर ठाण्यात 769 रुग्णांवर उपाचर सुरु आहे.
दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मास्क वापरण्यासाठी आवाहन केले आहे. तर निर्बंध नको असतील तर मास्क वापरा असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरीकांना दिला आहे.