अहमदनगर आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार! राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

मुंबई, 09 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील अहमदनगर शहर, तालुका आणि जिल्ह्याचे नाव बुधवार (दि.09) पासून अहिल्यानगर झाले आहे. यासंदर्भातील अधिसूचना आज राज्य सरकारने जारी केली आहे. तर काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने अहमदनगरला अहिल्यानगर असे नाव देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने यासंदर्भात कार्यवाही करून अहमदनगर शहर, तालुका आणि जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अहमदनगर आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाईल.

https://x.com/InfoAhilyanagar/status/1843961578628239609?t=4utldkBMEnQZIFTsRxa2NA&s=19

सरकारने अधिसूचना काढली

राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गावाला अहिल्यानगर असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी नावातील या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. दरम्यान, अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती. ही मागणी आता पूर्ण झाली आहे.

राज्याच्या प्रस्तावाला केंद्राची मान्यता

यासंदर्भात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 13 मे 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत अहमदनगर जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गावाचे नामांतर अहिल्यानगर असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या या प्रस्तावाला गेल्या आठवड्यात मान्यता दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने आता यासंदर्भातील सर्व बाबींची पूर्तता करून अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. तत्पूर्वी, राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे देखील नामांतर केले आहे. त्यानंतर आता अहमदनगरचे नाव बदलण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *