मुंबई, 29 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी 18 जूनपासून ते 15 जुलैपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना पीकविमा भरता येणार आहे. दरम्यान, सध्या खरीप हंगामाचा विमा भरताना काही सीएससी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम वसूल करत असल्याचा तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
https://x.com/dhananjay_munde/status/1806913337479032862?s=19
कृषीमंत्र्यांचा इशारा
सदर सीएससी केंद्र चालकांना विमा भरून घेण्याच्या कामासाठी राज्य सरकारकडून नियमितपणे मानधन दिले जाते. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांनी आपला पीक विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. जर एखाद्या सीएससी केंद्र चालकाने आगाऊ रकमेची मागणी केल्यास शक्य त्या पुराव्यासह कृषी हेल्प लाईनच्या 9822446655 या क्रमांकावर व्हाट्सपद्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार द्यावी, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. सदर केंद्र चालकावर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला.
एक रुपयात पीकविमा!
दरम्यान, पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. या योजनेत राज्यातील शेतकरी बांधवांना भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या 14 पिकांसाठी पीक विमा भरता येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून सीएससी केंद्रांमधून केवळ एक रुपयाचा विमा हिस्सा भरून आपला विमा भरता येईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.