हाथरस, 02 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील हाथरस येथे आज एका सत्संग कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच या घटनेत 150 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील फुलराई गावात आयोजित भोले बाबांच्या सत्संगादरम्यान ही घटना घडली. या घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.
https://x.com/ANI/status/1808113976057938170?s=19
https://x.com/myogiadityanath/status/1808103722851225625?s=19
उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती स्थापन
याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून दिली आहे. हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर राबवून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या अपघाताचा तपास करण्यासाठी एडीजी, आग्रा आणि अलिगढचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://x.com/PMOIndia/status/1808126276701446531?s=19
https://x.com/narendramodi/status/1808133810359619944?s=19
पीडितांना पंतप्रधानांकडून आर्थिक मदत
दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझी सहानुभूती आहे. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी कामना करतो. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या भीषण अपघाताबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोललो आहे. यूपी सरकार सर्व पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्यात गुंतले आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.