छत्रपती संभाजीनगर, 31 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरातील हातमोजे तयार करणाऱ्या कंपनीत आज मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या आगीत अडकलेल्या 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली आहे.
https://twitter.com/ANI/status/1741296349470204006?s=19
ही कंपनी रात्री बंद होती. तर कर्मचारी झोपलेले असताना आज मध्यरात्रीच्या सुमारास या कंपनीला आग लागली. आग लागली तेव्हा या कंपनीच्या आत 10-15 लोक होते. ही आग लागल्यानंतर त्यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, यांपैकी काही जण आत मध्येच अडकले होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन दलाला रात्री सव्वा दोनच्या सुमारास कळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा संपूर्ण कारखाना आगीने पेटला होता. आतमध्ये 6 जण अडकले होते. याची स्थानिक लोकांनी आम्हाला माहिती दिली. या 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी दिली आहे.
https://twitter.com/ANI/status/1741220066883227919?s=19
दरम्यान, वाळूज एमआयडीसी परिसरातील या कंपनीत कॉटन आणि लेदरचे हातमोजे बनविण्यात येत होते. या आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी याठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवून ही आग विझविली आहे. तर ही आग कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या याचा पोलीस तपास करीत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे.