राज्यात मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर!

मुंबई, 26 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत राज्यातील कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, महाराष्ट्र राज्यात राज्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा 5 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/MahaDGIPR/status/1772595629371305996?s=19

निवडणुकीच्या दिवशी सुट्टी मिळणार

राज्यातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार असल्याचे राज्य सरकारने या आदेशात नमूद केले आहे.

अन्यथा दोन तासांची सवलत मिळणार

दरम्यान, एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, या शासन आदेशानुसार, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी 2 तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे बंधनकारक राहणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांना या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच मतदान करण्यासाठी मतदारांना योग्य ती सुट्टी किंवा सवलत मिळाली नाही. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही, याबाबत मतदारांनी तक्रार केल्यास, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *