निरगुडे, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील एका शेतकऱ्याने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी सध्या उपोषण सुरू केले आहे. भगवान खारतोडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या 7 दिवसांपासून त्यांचे हे उपोषण सुरू आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आपण हे उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज निरगुडे गावात येऊन या उपोषणकर्त्या शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी त्यांनी भगवान खारतोडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याप्रसंगी सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, हनुमंत बंडगर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
https://twitter.com/supriya_sule/status/1747144959885762766?s=19
दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार: सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी आज निरगुडे येथे उपोषण करीत असलेल्या भगवान खारतोडे या शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी त्यांनी या शेतकऱ्यासोबत चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी गंभीर दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन भगवान खारतोडे यांना दिले. सोबतच त्यांनी खारतोडे यांना यावेळी उपोषण सोडण्याची विनंती केली. बारामती लोकसभा मतदारसंघात जनावरांसाठी चारा छावण्या आणि पाण्याचे नियोजन करण्यात यावे, या मागणीसाठी मी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याची माहिती देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.
दुष्काळ जाहीर करून चारा छावण्या सुरू करा: भगवान खारतोडे
तसेच भीषण परिस्थिती उद्भावण्याआधीच शासनाने तातडीने पावले उचलून उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, इंदापूर तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करून चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करा, अशी मागणी भगवान खारतोडे यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यांची ही मागणी मान्य करणार का? याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.