मुंबई, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्याविरुद्ध नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. तत्पूर्वी, शांतिगिरी महाराजांनी आज ईव्हीएम मशीनला हार घातल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ते या कृतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.
https://twitter.com/ANI/status/1792479016001409235?s=19
गुन्ह्याची नोंद!
अखेर शांतिगिरी महाराजांच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. नाशिक मतदारसंघात सध्या लोकसभेसाठी मतदान सुरू आहे. यावेळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज सकाळी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनला हार घातला होता. त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
याची मला कल्पना नव्हती…
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर या संदर्भात शांतिगिरी महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण ईव्हीएम मशीनला हार घातला नसून, ईव्हीएम मशीनच्या बाहेर असलेल्या कव्हरवर लावलेल्या भारत मातेच्या फोटोला हार घातला असल्याचे शांतिगिरी महाराजांनी म्हटले आहे. तसेच अशाप्रकारे आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होते, याची कल्पना नसल्याचे देखील शांतिगिरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
नाशिकमध्ये तिरंगी लढत
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात सामना रंगणार आहे. या तिन्ही उमेदवारांकडून लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे येथील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.