मुंबई, 11 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील तलाठी भरती परीक्षेचा निकाल 5 जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. तलाठी भरतीत प्रथम क्रमांक आलेल्या उमेदवाराला 200 पैकी 214 गुण मिळाले असल्याचा दावा, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. तसेच त्यांनी या परीक्षेच्या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे ही परीक्षा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
https://twitter.com/VijayWadettiwar/status/1745323301935919598?s=19
तलाठी पद भरती रद्द करावी!
यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सध्याची तलाठी भरती प्रक्रिया रद्द करावी. तसेच सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. “सरकारने खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा उद्योग बंद करायला हवा. सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधले गेले आहे. पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी टीसीएस व इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्यात यावी. पेपर फुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पद भरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने श्वेत पत्रिका काढावी. या संपूर्ण पद भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी.” असे विजय वडेट्टीवार यांनी या पत्रात म्हटले आहे.
परीक्षेत मोठा गैरप्रकार: वडेट्टीवार
“पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये टीसीएस कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. टीसीएसने आऊटसोर्स केलेल्या खासगी सेंटरवरील 19 हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये किमान 9 आरोपी समान आहेत. त्यांची मोडस ऑपरेंटी सारखीच आहे. 10 लाखात तलाठी व्हा! थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा! अशा पद्धतीने उमेदवारांना अमिष दाखविले जात आहे. परीक्षा सुरू होताच काही वेळात प्रश्नपत्रिका बाहेर येतात. या परीक्षेत उत्तरे पुरविण्यासाठी 3 लाख रूपये घेतले जातात. तळपायाला चिप लावून हिडन कॅमेऱ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका स्कॅन केली जाते. हे सगळे प्रकार समोर आले आहेत,” असे देखील विजय वडेट्टीवार यांनी या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.