मुंबई, 09 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या 7 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. यावेळी आज सकाळी साडेआठच्या सुमारास ईडीच्या पथकाने वायकर यांच्या घरावर छापा टाकला. त्यामुळे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते. त्यानंतर आता ईडीने वायकर यांच्या घरावर आणि त्यांच्याशी सबंधित 7 ठिकाणांवर छापा टाकला आहे.
https://twitter.com/ANI/status/1744586599621693524?s=19
रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता. रवींद्र वायकर यांनी कोणतीही परवानगी न घेता मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच यासंदर्भात त्यांनी तक्रार केली होती. तसेच या घोटाळ्याची चौकशी करून आमदार रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.
रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी येथे जमीन वापराच्या अटींमध्ये फेरफार करून मुंबई महानगरपालिकेच्या राखीव असलेल्या जागेवर पंचतारांकित हॉटेल बांधले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या घोटाळ्याच्या माध्यमातून त्यांनी 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा वायकर यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार आहेत. तसेच वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे.