मुंबई, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अफगाणिस्तान विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडे सोपविण्यात आले आहे. तसेच विराट कोहलीची देखील या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली आता एका वर्षानंतर टी-20 सामना खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे विराट आणि रोहितच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.
https://twitter.com/BCCI/status/1743989935747797076?s=19
सिराज आणि बुमराहला विश्रांती
तसेच अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवड समितीने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत या दोन्ही गोलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे भारताला ही मालिका बरोबरीत सोडविण्यात यश आले. त्यांच्या अनुपस्थितीत आता अर्शदीप यादव, आवेश खान आणि मुकेश कुमार हे भारताच्या वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळणार आहेत.
11 जानेवारी पासून मालिका सुरू
दरम्यान, अफगाणिस्तान विरुद्धच्या या टी-20 मालिकेत भारतीय संघ 3 सामने खेळणार आहे. यामधील पहिला सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे होणार आहे. तर दुसरा सामना 14 जानेवारी रोजी इंदोर येथे आणि तिसरा आणि शेवटचा सामना 17 जानेवारी रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. हे सर्व सामने सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत.
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-20 मालिकेतील भारतीय संघ:-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव, आवेश खान आणि मुकेश कुमार.