नवी दिल्ली, 25 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज 99 वी जयंती आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील ‘सदैव अटल’ स्मारकाला भेट देऊन अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर हे देखील उपस्थित होते. याशिवाय माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आदी नेत्यांनी यावेळी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
https://x.com/AHindinews/status/1739134529410105792?s=20
दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशात हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. तत्पूर्वी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देशभरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांना सर्व बूथवर अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यास आणि वाजपेयी यांच्या अद्भुत व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि कार्याबद्दल चर्चा करण्यास सांगितले आहे.
https://twitter.com/ANI/status/1739132923520192734?s=19
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावरून देखील अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. “देशाच्या सर्व कुटुंबीयांच्या वतीने मी माजी पंतप्रधान आदरणीय अटलबिहारी वाजपेयी जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. ते आयुष्यभर राष्ट्र उभारणीला गती देण्यात मग्न राहिले. भारत मातेसाठी त्यांचे समर्पण आणि सेवा त्यांच्या अमर वयातही प्रेरणास्थान राहील.” असे नरेंद्र मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
“मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करतो आणि त्यांना आदरांजली वाहतो. अटलजींनी देश आणि समाजाची निस्वार्थीपणे सेवा केली आणि भाजपच्या स्थापनेद्वारे देशातील राष्ट्रवादी राजकारणाला नवी दिशा दिली. एकीकडे त्यांनी अणुचाचणी आणि कारगिल युद्धाच्या माध्यमातून उदयोन्मुख भारताच्या सामर्थ्याची जाणीव जगाला करून दिली, तर दुसरीकडे देशात सुशासनाचे व्हिजन अंमलात आणले. त्यांचे अमूल्य योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल.” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.