बारामतीतील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आवाहन

बारामती, 23 जूनः बारामती कृषि विभागामार्फत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत ‘ फळबाग लागवड योजना’ राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, का. लिंबू, संत्रा, मोसंबी, सिताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभुळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफ्रुट अ‍ॅव्हाकॅडो, केळी, द्राक्ष आदी पिकांचा समावेश आहे. तसेच गुलाब, मोगरा व निशीगंध या फुल पिकांसाठीही महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लागवडीस परवानगी देण्यात आलेली आहे.

वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी 20 रोपे या मर्यादेत ही योजना राबविण्यात येत आहे. क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे निकष, विद्यापीठ शिफारशीनुसार अंतर मर्यादेतच देय राहणार आहे. मात्र अतिरीक्त कलमे, रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही. लागवड वर्षासह सलग 3 वर्षात मंजुर अंदाज पत्रकानुसार अनुदान देय राहणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती फळ पिकांसाठी जे लाभार्थी 90 टक्के फळझाडे जिवंत ठेवतील व कोरडवाहू फळपिकाचे 75 टक्के फळझाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहणार आहे.

लाभार्थी निकष कमीत कमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2.00 हेक्टर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा आहे. इच्छुक लाभधारकाच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. सातबारास कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या जाती, द्रारिद्रय रेषेखालील व्यक्ती, अल्प, अत्यल्प भूधारक, महिला लाभार्थी व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी ग्रामपंचायतीचे जॉबकार्ड धारक असावा.

सलग क्षेत्रावर फळबाग लागवड व बांधावर फळझाडे लागवडसाठी शेतकऱ्यांनी संबंधीत गावचे कृषि सहाय्यक यांचेकडे अर्ज करावेत, असे आवाहन बारामती उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *